मैत्रीतलं निखळ सौंदर्य
Tuesday, 17. February 2009, 20:02:57
मैत्रीच्या हजारो गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. जगभरातील वाङ्मयात, नाटकात, चित्रपटात आपल्याला मैत्रीच्या अनेक कथा व नाना रुपं पहायला मिळतात. श्रीकृष्ण सुदामाची गोष्ट तर सर्वपरिचित आहेच!
मित्राचं महत्त्व अनेकांनी अनेक प्रकारे सांगितलं आहे. कुणी म्हटलं आहे संकटसमयी कामी येतो तो खरा मित्र. कुणी म्हटलंय, मैत्री ही ईश्वरी भेट आहे. कुणी मैत्रीला सर्वात जवळचं मानलंय तर कुणी मैत्रीला सर्वस्व मानलंय. यात हेलन केअरचं मत उठून दिसतं. आपल्या अपंगत्वावर, अंधत्वार मात करून इतिहास घडवणाऱ्या हेलन केलरने म्हटले आहे की, 'एकट्यानं प्रकाशात चालण्यापेक्षा मित्रासोबत अंधारात चालणं केव्हाही चांगलंच!
आई-वडील, बहिण-भाऊ, मामा-मावशी, आजी-आजोबा ही आणि अशी सगळीच नाती आपण निवडलेली नसतात. ती जन्माने लाभतात. पण मित्र आपण निवडलेला असतो. तो सर्वार्थाने आपला असतो. ते नातं आपण निर्माण केलेलं असतं. आपण फुलवलेलं असतं. म्हणूनच मित्र आपल्याला अधिक जवळचे वाटतात. तरुणाईत तर मैत्रीला बहर येतो. मैत्रीचे कितीतरी कंगोरे अनुभवण्याचा हाच तर काळ असतो. नवे मित्र आयुष्यात येणं, ते अधिकाधिक जवळचे होत जाणं किंवा कधीतरी दूर जाणं, हे याच वयात होत असतं. संभ्रमाच्या या काळात प्रत्येकाला मित्राचा आधार हवा असतो. म्हणून माणसं आपली जिव्हाळ्याची बेटं निर्माण करतात.
त्यामुळेच जसे आपण मातृदिन साजरा करतो, गुरुपौणिर्मा, रक्षाबंधन साजरे करतो. त्याच उत्साहात आपण आता 'फ्रेंडशिप डे' सुद्धा साजरा करतो.
मैत्री नसते दोन शब्दांचा खेळ,
नसते निव्वळ छेडाछेडीची वेळ.
मैत्री म्हणजे प्रत्येक क्षणात,
क्षणातील प्रत्येक सुखदु:खात,
साथ द्यायची असते ती वेळ...


















