संस्कृतिरक्षण?
Monday, 9. February 2009, 20:10:42
प्रभू रामचंद म्हणजे साक्षात् मर्यादापुरुषोत्तम. त्यांचे नाव धारण करून काम करणाऱ्या संघटनेने स्वत:च्या भोवतीही मर्यादेचे रिंगण आखून त्यातच काम करायला हवे. पण मंगळुरात तसे झालेले दिसत नाही. संस्कृतिरक्षणाचे 'कार्य' हाती घेतलेल्या तरुणांच्या गटाने 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्थानिक पबवर हल्ला चढवला. हे करताना सोबत टीव्हीचे कॅमेरे नेण्यास ते विसरले नाहीत. त्यानंतर जे काही घडले, ते साऱ्या जगाने बघितले.
संस्कृतीच राखायची तर, घराघरात चालणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभू रामचंदांच्या पाइकांनी पुढे यायला हवे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आजही ग्रामीण भागात महिलांना दहा किलोमीटरवरून डोक्यावर पाण्याचे घडे वाहावे लागतात. या पाइकांपैकी किती जणांनी आजवर एकदा तरी त्यांच्या डोक्यावरील एखादा हंडा स्वत:च्या डोक्यावर घेऊन दोन पावलांची वाटचाल केली? अंधश्रद्धा आणि दुष्ट रुढी यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये सर्रास स्त्रीगर्भाची हत्या होते. त्या रोखण्यासाठी या संघटनेने काय केले? पैशाच्या चणचणीमुळे तरुण मुलींना कुंटणखान्यात सर्रास विकले जाते. ते काम करणारे पुरुषच असतात. त्यांचा हात कोणी धरला? खैरलांजीसारख्या घटना होतात व माणुसकीलाच काळिमा फासला जातो. तेव्हा यापैकी कितीजण पुढे आले?
भारतीय संस्कृतीचेच रक्षण करायचे, तर ते पबमध्ये नव्हे घराघरात, रस्त्यांवर आणि शेतांत, कारखान्यांत तिथल्या महिलांचे रक्षण केल्याने होऊ शकेल. पण तसे करायचे, तर टीव्हीचे कॅमेरे कसे येणार? आणि देशभर प्रसिद्धी तरी कशी मिळणार?














How to use Quote function: