Monday, 23. November 2009, 16:38:57
कवडसा, गप्पा, कथा
नमस्कार,
गेले कित्येक दिवस मी इथं काही उत्स्फुर्त असं, काही जमवलेलं, काही मिळालेलं असं लिहीत आलोय. वाचकसंख्या बघता, आणि दिवसाला दिल्याजाणाऱ्या भेटींचा आकडा बघता तुम्हाला हा ब्लॉग आवडतोय असं मी (निर्लज्जपणे) गृहीत धरतोय.

बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर मी जमेल तसं लिहीण्याचा प्रयत्न केला. कसं लिहीलं ते मला माहीत नाही, माहित करुनही घ्यायचं नाहीये. कारण, जे जे डोक्यात आलं ते ते मी इथं लिहीत गेलो. गेल्या काही महीन्यांपासुन (खरं सांगायचं तर माझा स्वतःचा व्यवसाय सुरु झाल्यापासुन) मला इथं लिहायला वेळ तसा फारसा मिळत नव्हताच. आज थोडा मिळाला, आणि मग मी ही मागची पोस्ट लिहीली.
पण आता कामातुन मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत विरंगुळा म्हणुन, आणि माझ्याही डोक्याला थोडी चालना म्हणुन मी इथं एक कथा लिहायचं ठरवलंय. सगळी कथा काय माझ्या डोक्यात तयार नाहीये, त्यामुळं कथानक विणत-विणतच मला इथं लिहावं लागणार आहे. शिवाय हा माझा असला पहिला-वहीलाच प्रयत्न असल्यानं जरा जपुनच लिहीणार आहे. मला आत्ता या क्षणी अजिबात कल्पना नाहीये की ही कथा कशी असेल ती. पण शक्यतेवढा वास्तवतेचा "लुक ऍन्ड फील" द्यायचा माझा प्रयत्न असेल. (’वास्तव’ म्हटलंय, ’सत्य कथा’ नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
कथेला शिर्षक काय द्यायचं इथ-पासुन माझी सुरुवात आहे! हां, पात्रांसाठी मात्र मी फारसं डोकं लावणार नाहीये. आसपासच्याच व्यक्तींची नावं वापरणार आहे.

(व्यवसायानं सॉफ्टवेअर ईंजीनीयर असल्यानं KISS - Keep It Simple Stupid! या उक्तीप्रमाणं सोप्पं सोल्युशन शोधलं आहे.) कथा बहुदा प्रथम-व्यक्तीमध्ये असेल - म्हणजेच कथेचं जे पात्र मध्यभागी आहे, त्याच्याच तोंडुन ती सांगितली जाईल. काही ठिकाणी मात्र निवेदक पात्र बदलेलही कदाचित, पण ते सगळं कथेतल्या घडामोडींवर आधारीत असेल.
याच आठवड्यात कथेला सुरुवात करण्याचा माझा मनसुबा आहे. देव करो आणि हे धनुष्य मला पेलवले जावो..! तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची आणि प्रतिसादाचीसुद्धा अपेक्षा करतोय. (हा माझा आगाऊपणाच आहे, पण मला तो करायला आवडतो.)
तेव्हा आता आपली पुढली भेट थेट कथेसोबतच!
तुमचाच,
प्रभास गुप्ते
Monday, 23. November 2009, 14:37:52
आठवण, कथा
राम वनवासात निघाला होता तेव्हाची ही गोष्ट.
राम, लक्ष्मण, सिता असे सगळे पायी चालले होते. वाटेत त्यांना एक नदी लागली. बरंच मोठ्ठं पात्र होतं त्या नदीचं. सहजा-सहजी पोहत जाऊन पार करण्यासारखं नव्हतं ते. राम आणि लक्ष्मण विचारात पडले, नदी पार जायचं कसं???
तेवढ्यात त्यांना एक नाव आणि नावाडी दिसला. त्यानं रामाला ओळखलं लगेच.
मग राम, लक्ष्मण, सीता हे सगळे त्या नावेत बसुन पलिकडच्या तीरावर निघाले.
नावाड्यानं वल्हवण्याचे एवढे कष्ट करुन आपल्याला या पैलतीरी आणलं, त्याबद्दल त्याला काहीतरी मोबदला दिला पाहीजे, असा विचार रामाच्या डोक्यात आला. रामानं सीतेला तशी खुण केली. सीतेनं लगेच आपल्या बोटातली अंगठी काढली आणि त्या नावाड्याला देऊ केली. नावाड्यानं ती नाकारली!
ते पाहुन राम त्याला (नावाड्याला) म्हणाला, "अरे, तुझी मजुरी आहे ती! मी कोणाचेही कष्ट असे फुकट स्विकारत नाही."
नावाडी विनम्रतेनं हात जोडुन म्हणाला, "प्रभु, नाव्ह्याकडुन नाव्ही घेत नाही, धोब्याकडुन दुसरा धोबीसुद्धा घेत नाही. ही मजुरी देऊन हा प्रघात मोडु नका.."
नावाड्याचं हे उत्तर ऐकुन रामासकट सगळेच विचारात पडले. नाव्ह्याकडुन नाव्ही घेत नाही हे ठिक आहे, धोब्याकडुन धोबी घेत नाही हे पण ठिक आहे, पण या नावाड्याचं आणि माझं काम एकच कसं???
थोडा वेळ विचार करुन शेवटी रामानं ठरवलं, या नावाड्यालाच विचारु काय ते स्पष्टीकरण.
तेव्हा नावाडी म्हणाला,
"नाव्ह्याकडुन नाव्ही घेत नाही, धोब्याकडुन दुसरा धोबीसुद्धा घेत नाही. ही मजुरी देऊन हा प्रघात मोडु नका..
प्रभु, तुम्ही माझ्या तीरावर आलात, मी तुम्हाला पलिकडच्या तीरावर आणलं.. जेव्हा मी तुमच्या तीरी येईन, तेव्हा तुम्ही मला पैलतीरी लावा!"
नावाड्याची हुशारी पाहुन राम अचंबीत तर झालाच, पण त्याच्यावर खुषपण झाला!!
- उत्तर भारतीय भजनावर आधारीत -