मी संदिप खरेंचा फॅन आहे. त्यांच्या बऱ्याच कविता मला आवडतात. त्यांतलीच एक "मोर्चा". आयुष्यात कोणतीच गोष्ट न करणारा, काय योग्य काय अयोग्य, काय चांगले काय वाईट हे काहीही न बघणारा आणि त्यावर कोणतेच भाष्य, कृती न करणारा माणुस या कवितेत रेखाटला गेलाय. या कवितेत वापरलेली उदाहरणं, उपमा इतक्या चपखल आहेत की तोंडातुन "अरे व्वा!" बाहेर पडल्याशिवाय राहत नाही.
मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही ॥धृ॥
भोवताली संगर चाले तो विस्फारुन बघतांना कोणी पोटातुन चिडतांना कोणी रक्ताळुन लढतांना मी दगड होऊनी थिजलो रस्त्याच्या बाजुस जेव्हा तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही ॥१॥
नेमस्त झाड मी आहे मुळं फांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो थंडीत झाडली पाने पण पोटातुन कुठलीही खजिन्याची ढोली नाही कुणी शस्त्र लपवले नाही कधी गरुड बैसला नाही ॥२॥
धुतलेला एकच सदरा तुटलेली एकच गुंडी टकलावर अजुन रुळते अदृष्य लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो मी देवालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही ॥३॥
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो मज चिरता-चिरता कोणी रडले वा हसले नाही मी कांदा झालो नाही आंबा ही झालो नाही ॥४॥
नुकताच ’आयुष्यावर बोलु काही’चा ५००वा प्रयोग पार पडला. पुण्याच्या गणेश कला-क्रिडा मंच मध्ये झाला हा कार्यक्रम. २६ जुलै २००९ रोजी झी मराठीवरुन त्याचं प्रसारण केलं गेलं.या कार्यक्रमात सलिल कुलकर्णी आणि संदिप खरे यांनी एक नविन, नुकतीच लिहीलेली कविता ऐकवली.. "दमलेल्या बापाची कहाणी".
"सांगायची आहे माझ्या सानुली तुला, दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" इतकी मनाला भिडणारी कविता बनली आहे ही की बास्स...!
हॉलमध्ये उपस्थीत असलेल्या आणि नंतर टि.व्ही.वर ही कविता ऐकलेल्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतुन पाणी काढलं या कवितेनं...
एका लहान मुलीच्या मनाला तर ही कविता इतकी भिडली की धाय मोलकडुन रडायलाच लागली ती! तुम्ही सुद्धा ऐका. गेले काही दिवस मी हा विडीयो शोधतोय. आज मिळाला. डाऊनलोडच करुन ठेवलाय आता. खाली दिलेला विडीयो त्या कार्यक्रमाच्या प्रसारणावरुन रेकॉर्ड केलेला आहे.