३४८... आणि प्रवासाचे वेध!
Saturday, December 13, 2008 7:11:04 AM

खरंतर आज थोडा उशीरच केलाय मी ब्लॉगवर यायला... पण चलता है.. आज शनिवार ना! माझा सुट्टीचा दिवस... त्यामुळं सगळं कसं अगदी आरामात चालु आहे. आरामात उठणं, आरामात चहा ढोसत बसणं, आणि आरामातच अंघोळ करणं.. आणि मग आता आरामात कमलोय ब्लॉगवर..

जसा आपल्या भारत सरकार समोर ’कश्मीर प्रश्न’ सदैव अनुत्तरीत आहे, तसाच ’या विक-एन्डला काय करायचं?’ हा माझ्यासमोरचा अनुत्तरीत प्रश्न आहे. दर विक-एन्डला तिच बोंब माझी.. बर, पुस्तकं रिडावी म्हटलं तर रिडुन-रिडुन रिडु किती हो? त्यापेक्षा कुठेतरी भटकंतीला जावं असं वाटतं. पण आजुबाजुची बरीच ठिकाणं फिरुन झालीत. काही आहेत बाकी, ती पण होतीलच हळुहळू. आमचं मित्रांचं सगळं काही अगदी ऐनवेळेलाच ठरतं. त्यामुळं आत्ता तरी काहीच नाही ठरलंय.
तसा रविवारचा दिवस आहेच हातात भटकंतीसाठी.आता एकदा गुऱ्हाळ बघायला जायचंय. या आधी एकदा पाहिलं होतं, पण परत एकदा जायचंय. डोंबिवलीला राहणारी माझी आत्या आली की तिला घेऊन जाऊ आम्ही गुऱ्हाळ पहायला. अगदी उसाचा रस त्या काहीलीत ओतल्यापासुन ते गुळाची ढेप तयार करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे फोटु क्लिकायचे आहेत मला. तिकडे जाऊन आलो की सविस्तर माहीती लिहिनच इकडं. फोटुपण दाखवेन तुम्हाला.
तशी मला प्रवासाची आवड फार..! कोणताही प्रवास असो, मी तो आनंदानं करतोच. बस, ट्रेन, गाडी... कशानी का असेना, पण प्रवास एकदम आवडीचा. कुटुंबासोबत भटकंती तशी बरीच झाली आहे. कन्याकुमारी, केरळ, गोवा आणि कोकण ही काही माझी अत्यंत आवडीची ठिकाणं. कितीही वेळा तिकडं जाईन मी.
खास करुन कन्याकुमारी.. आपण भारताच्या अगदी शेवटच्या टोकाला उभे आहोत हा विचारच शहारुन टाकतो! तसं पाहिलं तर अगदी छोटंसं गांव हे. पण महत्व बघा किती येतं ते... शिवाय समोर अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांचं पाणी अक्षरशः वेगवेगळं दिसतं. आणि त्यानंतर गोवा-कोकणचा नंबर. तिथं तर निसर्गानी आपल्या सौंदर्याची अगदी मुक्तहस्ते उधळण केलीये! ती सुंदरता अशी वर्णनं वाचुन नाही कळणार कधी.. प्रत्यक्ष जाऊनच त्याचा अनुभव घ्यायला हवा. आणि आता तर डिसेंबर म्हणजे ’गोवा कर्निवल’चे दिवस!
हॉटेल्सची बुकींग्स आत्तापासुनच फुल्ल व्हायला लागली असतील तिकडे. तिकडची चर्चेस, पणजीच्या त्या जेट्टी... बिच... सगळं कसं आनंदाची लयलुट करण्यासाठीच जणु. गोव्यातला एक खास पदार्थ आहे ’बेबिन्का’. गोड असतो तो. पण अप्रतीम! अंडं मैद्याच्या पीठात फेटुन बनवला जातो तो. त्याला जितके पापुद्रे जास्ती तेवढी जास्ती त्याची किंमत असते. मला फार आवडतो तो. एकदा इंटरनेटवरुन त्याची रेसिपी शोधुन मग आईकडुन करुन घेतला होता. झक्कास चव...! तसंच कन्याकुमारीला मी ’केळ्याची भजी’ खाल्ली होती. ती पण मस्तच. कच्चं केळं उभं चिरुन, त्याची काप मग भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवुन तळुन काढायची... की बनली केळ्याची भजी! पण चव छान लागते ती. 
प्रवास करण्याचे किती काय-काय फायदे असतात नाही? वेगवेगळ्या ठिकाणची लोकं कशी राहतात ते कळतं.. तिथल्या परंपरा आणि पद्धती कळतात.. स्थानिक पदार्थ... चवी.. आपला देश कळतो... थोडक्यात काय तर ज्ञानात भर पडतेच!
तरीपण अजुन बराच प्रवास करायचा बाकी आहे. भविष्यात तो पण करेनच मी. तुम्ही असे कुठं कुठं फिरला आहात? तुमची आवडीची ठिकाणं कोणती? सांगा की मला... म्हणजे मला पण जाता येईल आणि तो आनंद लुटता येईल. आज-काल मला प्रवास करण्याची अतिव इच्छा होते आहे. त्यामुळं लवकरच माझा प्रवास घडणार कुठेतरी नक्कीच! माझ्या इच्छा मी कधीच मारुन ठेवत नाही. योग आहेत प्रवासाचे तर! वा वा वा! हा अधिरपणा पराकोटीला वाढेल तेव्हा नक्कीच मी कुठल्या ना कुठल्या प्रवासाला निघालेलो असेनच...
तर मग, सांगताय ना तुमचे प्रवास आणि सुचवताय ना ठिकाणं?

chimanrao # Saturday, December 13, 2008 8:33:09 AM
हो हो सुचवतो ना.
नाशिकला जा.
Prabhas Gupteprabhas # Saturday, December 13, 2008 8:36:37 AM
आयुष्यातली २० वर्ष तिकडंच राहिलोय मी!
Anonymous # Sunday, December 14, 2008 8:06:10 AM
Prabhas Gupteprabhas # Monday, December 15, 2008 4:00:21 AM
आणि हो, तुला पण होईल कोकण दर्शन लवकरच.